घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

दोन सख्या बहिणी झाल्या एकाच वेळी एमबीबीएस: आई वडिलांचे स्वप्न केले साकार

प्रेरणादायी; ग्रामीण भागातील डॉ. नेहा व डॉ. दिव्या चव्हाण यांची यशोगाथा


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     एका लहानशा गावातून उगम पावलेल्या डॉ. नेहा आणि डॉ. दिव्या चव्हाण या सख्या बहिणींनी एकाच वेळी एमबीबीएस पदवी मिळवून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. एकीने अंबाजोगाई येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून, तर दुसरीने जळगाव येथून ही शैक्षणिक कामगिरी पार पाडली आहे.परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील ब्राह्मणगाव या गावातील या बहिणी आहेत.

    त्यांच्या या यशामागे आहेत त्यांचे वडील सखाराम चव्हाण, जे सध्या येसेगाव (ता. जिंतूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या मुलींमध्ये शिक्षणाची गोडी लावली आणि त्या दोघींना प्रेरणा देणारे मार्गदर्शन केले. डॉ. नेहा आणि डॉ. दिव्या यांनी आपले प्राथमिक शिक्षण जिंतूरच्या संचारेश्वर विद्यालयात, तर माध्यमिक शिक्षण जवाहर विद्यालयात पूर्ण केले.

आजोबांचे शब्द कायम आठवणीत

     शालेय जीवनातच त्यांचे आजोबा सतत सांगायचे, "मुलींनो, डॉक्टर व्हा आणि समाजसेवा करा." या प्रेरणादायी वाक्यांनीच दोघींनी मनाशी ठरवले होते – डॉक्टरच व्हायचं! याच ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी NEET परीक्षेची तयारी सुरू केली आणि २०१९ मध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून एमबीबीएस प्रवेश घेतला.

पाच वर्षे सहा महिन्यांची अखंड मेहनत

    या दोघींनी सलग पाच वर्षे सहा महिने कठोर परिश्रम घेतले, अभ्यासात सातत्य ठेवले आणि अखेर एमबीबीएसची पदवी सन्मानाने मिळवली. डॉ. नेहा अंबाजोगाईच्या तर डॉ. दिव्या जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून उत्तीर्ण झाल्या.

"ध्येय, जिद्द आणि सातत्य यामुळेच हे शक्य झाले."

   "गुरुजनांचे मार्गदर्शन, आई-वडिलांची साथ आणि आपले स्वप्न लक्षात ठेवून आम्ही सुरुवातीपासूनच अभ्यासाकडे गांभीर्याने पाहिले. कितीही अडचणी आल्या तरी हार न मानता यशासाठी प्रयत्न केले," असे मत डॉ. नेहा आणि डॉ. दिव्या यांनी व्यक्त केले.



वडिलांचा अभिमान अन् आनंद गगनात मावेनासा

  "माझ्या दोन्ही मुली डॉक्टर झाल्याचा मनस्वी आनंद आहे. फक्त माझ्या मुलींनीच नव्हे, तर गावातील प्रत्येक विद्यार्थ्याने शिकावे, यशस्वी व्हावे, यासाठी मी शैक्षणिक जनजागृती करत आलो आहे. मुलांनी शिक्षणातून प्रगती करावी, हीच माझी खरी कमाई," असे सखाराम चव्हाण यांनी सांगितले.

    ही कथा केवळ दोन बहिणींच्या यशाची नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्रोत आहे – जिथे शिक्षणाची आस, कष्टाची तयारी आणि योग्य मार्गदर्शन असेल, तिथे कुठल्याही परिस्थितीतून यश गाठता येते हे या दोघींनी सिद्ध केले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या