वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
जालना जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात आरटीओच्या वायू वेग पथकाने मोठी कारवाई केली आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. चंद्रमोहन चिंतल यांच्या मार्गदर्शनाखाली ६ जून २०२५ रोजी गोंदी, पाथरवाला बु., पाचोड शहागड, मंठा, हसनाबाद व राजूर या भागांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईदरम्यान एकूण ३८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून तब्बल ₹५,४८,०००/- इतका दंड वसूल करण्यात आला.
ही तपासणी विशेषतः अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा व टिप्पर वाहनांवर केंद्रित होती. तपासणीदरम्यान खालील नियमभंगांवर कारवाई करण्यात आली:
- भार क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहणारी वाहने
- विनापरवाना धावणारी वाहने
- विना नोंदणी क्रमांक असलेली वाहने
- विमारहित व कालबाह्य फिटनेस प्रमाणपत्र असलेली वाहने
- रस्त्यावर सुरक्षेला धोका ठरणारे चमकदार (dazzling) लाईट्स व विना रिफ्लेक्टर वाहने
- विशेष म्हणजे, अधिक वाळू वाहतूक करणारी ३ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई मोटार वाहन निरीक्षक भीमराज नागरे, श्रीमती संजीवनी चोपडे, सहायक मोटार वाहन निरीक्षक अमोल राजपूत, राजकुमार मुंडे, श्रीमती राधा साळुंखे आणि चालक आसाराम घुले, भागवत पारिस्कर आदींच्या पथकाद्वारे करण्यात आली.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांनी या मोहिमेविषयी सांगताना स्पष्ट केले की, "वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अशाच प्रकारच्या कठोर व सातत्यपूर्ण कारवाया पुढेही राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी कायद्याचे पालन करून सुरक्षित आणि नियमबद्ध वाहतूक व्यवस्थेला हातभार लावावा."
आरटीओच्या या धडक मोहिमेमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून जिल्ह्यातील वाहतूक शिस्तीबाबत सजगता वाढण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment