घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

जालना नूतन जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांची कामगीरी

 जालना जिल्ह्याच्या नवीन जिल्हाधिकारीपदी श्रीमती आशिमा मित्तल यांची नियुक्ती; नाशिक जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्याचा ठसा


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      श्रीमती आशिमा मित्तल यांनी शुक्रवार, दि. 1 ऑगस्ट 2025 रोजी जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला. याआधी त्या नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. नाशिक येथे कार्यरत असताना त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये, विशेषतः शिक्षण आणि बालविकास यामध्ये अनेक स्तुत्य उपक्रमांची अंमलबजावणी करून आपली प्रशासकीय कार्यक्षमता सिद्ध केली आहे.

      श्रीमती मित्तल या मूळच्या राजस्थान राज्यातील जयपूर येथील रहिवासी असून त्यांनी आयआयटी मुंबई येथून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक. पदवी प्राप्त केली आहे. या अभ्यासक्रमात त्यांना शंकर दयाल शर्मा सुवर्ण पदक प्राप्त झाले. त्यांनी नंतर मानववंशशास्त्र (Anthropology) या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

     सन 2017 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण करत देशात 12 वा क्रमांक पटकावणाऱ्या श्रीमती मित्तल यांनी 2018 साली महाराष्ट्र कॅडरमध्ये रुजू होऊन प्रशासकीय सेवेला सुरुवात केली. डहाणू येथे आयटीडीपी प्रकल्प अधिकारी, तसेच अहिल्यानगर येथे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रारंभिक सेवा बजावली.

     नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘सुपर 50’ उपक्रम राबवला. या अंतर्गत 200 विद्यार्थ्यांना JEE, NEET व CET परीक्षांसाठी निवासी प्रशिक्षण देण्यात आले. यातील 22 विद्यार्थ्यांनी JEE Main परीक्षा उत्तीर्ण केली, तर 7 विद्यार्थ्यांनी JEE Advanced मध्ये यश संपादन करून IITमध्ये प्रवेश मिळवला.

   राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. या यशाबद्दल राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाकडून श्रीमती मित्तल यांना विशेष प्रशस्तीपत्र देण्यात आले. तसेच ‘भगवान महावीर स्वामी निर्वाण कल्याणक’ निमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सर्वाधिक विद्यार्थी सहभागी झाल्याबद्दल महामहिम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांचा राजभवन, मुंबई येथे सत्कार झाला.

     मुख्यमंत्री कार्यालयीन सुधारणा उपक्रमात नाशिक जिल्हा परिषदेने राज्यात तिसरा क्रमांक मिळवला असून दि. 7 मे 2025 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रीमती मित्तल यांचा सत्कार करण्यात आला.

    बालकांचे पोषण आणि कल्याण या क्षेत्रात त्यांनी उचललेली पावले विशेष कौतुकास्पद ठरली. सलग दोन वर्षे – 2023 व 2024 – महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाने त्यांना ‘बालस्नेही पुरस्कार’ प्रदान केला आहे.

  3030 स्वमालकीच्या अंगणवाडी केंद्रांना वीज जोडणी देण्यासाठी राबवलेल्या विशेष अभियानात नाशिक जिल्ह्याने आघाडी घेतली. या उपक्रमामुळे राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी केंद्रांसाठी वीजजोडणीचा अनुकरणीय आदर्श निर्माण झाला आहे.

    प्रशासकीय सेवेत रुजू होण्यापूर्वी त्यांनी नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कार्य केले असून अनेक स्वयंसेवी संस्थांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या सामाजिक संवेदनशीलतेमुळेच प्रशासकीय सेवेत येण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे त्या स्पष्टपणे सांगतात.

   श्रीमती आशिमा मित्तल यांचा अनुभव, कार्यक्षमता व सामाजिक भान यामुळे जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्या निश्चितच प्रभावी ठरणार आहेत, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या