घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
छत्रपती संभाजीनगर येथील कामगार विभागाचे सरकारी अधिकारी गोविंद गावंडे यांनी या प्रकरणाची तक्रार मंठा पोलिस ठाण्यात दाखल केली होती. गावंडे व त्यांच्यासोबतच्या दक्षता पथकाने आकणी गावात प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली असता, स्वाती शिवाजी उबाळे, देवराव नारायण बदर आणि दुर्योधन रामभाऊ जाधव यांच्या नावाने सादर करण्यात आलेली सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
ग्रामसेवक खेडकर यांनी स्पष्ट केले की, संबंधित तिघे आकणी गावचे रहिवासी नाहीत आणि ग्रामपंचायतीकडून कोणतेही मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यात आलेले नाही. मात्र, नातेवाईक व दलालांनी संगनमताने बनावट मृत्यू प्रमाणपत्रे, ग्रामपंचायतीचे खोटे सही-शिक्के वापरून शासनाचा निधी लाटला.
या प्रकारात शिवाजी लक्ष्मण उबाळे, कमल देवराव बदर आणि तेजस दुर्योधन जाधव यांच्या विरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार संतोष माळगे हे पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
या घटनेच्या अनुषंगाने, मंठा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बनावट कामगार नोंदणी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंठा शहर, तळणी परिसर तसेच अन्य ग्रामीण भागात ऑनलाईन सेवा केंद्र चालक आणि दलालांनी संगनमताने आधारकार्डमध्ये फेरफार करून नागरिकांची बनावट कामगार नोंदणी केली, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
स्थानीय नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मंठा तालुक्यातील सुमारे ५० टक्क्यांहून अधिक मतदारांची ऑनलाईन कामगार नोंदणी झाली असून, त्यांच्याच नावावर कामगार अनुदान, शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यात आला आहे. हे सर्व प्रकार संबंधितांची माहिती न देता आणि त्यांचा गैरफायदा घेऊन करण्यात आले.
वाटूर रोडवरील काही विशिष्ट सेवा केंद्रासह मंठा शहरातील काही सेवा केंद्र चालकांनी, दलालांच्या मदतीने आधार माहितीमध्ये फेरफार करत फसवणूक केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यासाठी संबंधितांकडून हजारोंच्या प्रमाणात पैसे उकळण्यात आले असून, आर्थिक शोषणाच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत.
या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी मंठा तालुक्यातील नागरिकांमधून होत आहे. शासनाच्या योजनांचा गैरवापर करून गरजूंना लाभापासून वंचित ठेवणाऱ्यांना कोणतीही गय नको, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.
या प्रकरणी पुढील तपास काय दिशा घेतो आणि आणखी कोणकोणत्या नावांचा उलगडा होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment